Skip to main content

चोचल्यांचे बंड......!!






 चोचल्यांचे बंड......!!


"शरीराला व्यायाम आणि डाएटची गरज आहेतसेच 
आत्म्याला बटाटा वडा व मिसळपावची. आत्म्याचेच ऐकावे, कारण शरीर नश्वर आहे अणि आत्मा अमर आहे.....!!" <<--- Gyan from WA University😆)


गेल्या वर्षी मी माझ्या पत्नीच्या पाकशास्त्र कौशल्यावर  लिहिलेला 'किचन क्वीन' हा लेख खूप viral झालातो वाचल्यावर एका भगिनीने तर मला विचारले कि तुम्ही खाद्यसंस्कृतीवर डॉक्टरेट करताय का ?? खरं म्हणजे विविध पदार्थांचा उल्लेख त्यांत असला, तरी पदार्थांच्या अभिरुचींवर फार काही लिहिलं नव्हतं. रोजच्या व्यवहारात आपल्याला अमुक एक गोष्ट आवडते, अमुक एक आवडत नाही, त्याची कारणे वगैरे गोष्टींवर चिंतन होते. ( कधीतरी मी introspection mode मध्ये असलो कि आत्मपरीक्षण होतच असते.भरपूर वेळ असतो ना मला 😀). उदापॅसेंजर म्हणून प्रवास करताना गाडीत नेहमी मला डावीकडच्या सीटवर बसलेले आवडते; मग ती कार असो, बस असो, नाहीतर ट्रेन असो काय बरं कारण असेल ?? वर्षानुवर्षे आपण आपल्या आवडी-निवडी जपलेल्या किंवा जोपासलेल्या असतात. आणि साठीकडे झुकलेल्या माझ्यासारख्या माणसाला आता त्या सवयी बदलणं शक्य नाही. खाण्याच्या बाबतीतल्या आपल्या आवडी -निवडींना मराठीत 'चोचले' असा थोडा उपहासाचा हलका स्पर्श असलेला शब्द आहे. खरं सांगायचं तर मी काही 'खवैय्या' नाही. माझी पत्नी ही स्वतःहूनच चांगल्या चुंगल्या रेसिपीज किंवा पदार्थ करत असते, त्या मी अगदी वाखाणून खातो इतकेच. पण तू आज अमुक कर, किंवा तमुक कर असे डोहाळे लागल्यासारखे मी तिला सहसा सांगत नाही. तरी देखील अमुक एक पदार्थ असा-असा केला म्हणजे आपल्याला आवडतो हे कळण्याइतकी ह्या विषयातील जाणकारी मला नक्कीच आहे. ती माझ्यापुरती मर्यादित आहे असे म्हणूयात हवं तर. आता त्याला तुम्ही 'खवय्येगिरी' म्हणत असाल, तर माझी काही हरकत नाही. मध्यंतरी असाच माझ्या खाद्यपदार्थांतील आवडीनिवडींवर जरा विचार करत होतो आणि सुचेल तसे लिहायला सुरुवात केली .....  आणि......पहाता पहाता माझ्या ब्लॉगमधल्या अजून एका दीर्घलेखाचा जन्म झाला. आपण त्याला 'चोचल्यांचे बंड- क्र ' असे नांव देऊयातजर हे लेखन वाचकांना आवडले, तर मी क्र लिहायचा नक्की विचार करेन .... .  

चहा

माझी दिवसातली सगळ्यात आवडती वेळ म्हणजे सकाळी ७.३०-८.०० वाजताची, जेव्हा मी पत्नीबरोबर तिने केलेला फर्मास चहा घेतो. छोटा गंधर्व म्हणतात तसे बाहेर 'पक्षी मधुर शब्द करीती' अर्थात पक्षांचे कूजन चालू असते. कोणी आपल्या साखरझोपेतून उठो वा न उठो, सूर्याने आपली किरणे फाकवुन सृष्टीत चैतन्य निर्माण केलेलेच असते. करोना येण्यापूर्वी म. टा. वर नजर टाकायची पण सवय होती.  ही सवय  कै गोविंदराव तळवलकर संपादक होते तेव्हापासूनची आहे. Habits are die-hard !! मग अनिरुद्ध बापूंचा 'प्रत्यक्ष' हा पेपर वाचायचा. हा सगळा कार्यक्रम अर्धा तास तरी सहज चालतो. माझी बॅटरी चार्ज व्हायला एव्हढे पुरेसे असते. चहा मात्र 'ही' मला अगदी हवा तसा करते.  म्हणजे नक्की कसा ते पाहुयात.  दूध घालण्यापूर्वी  भरपूर उकळून जवळजवळ काळपट लाल किंवा लालसर काळा झालेला चहा मला स्वतःला आवडतो. शक्यतो ठेचून घातलेले आले त्यात असेल तर 'चार चांद' लागले. माझी पत्नी मूडमध्ये असली तर 'गवती चहा' देखील कातरून चहात घालते. ह्या अशा अतरंगी चहा उकळण्याने त्याची ऍसिडिटी वाढते हे मलाही माहिते. पण ती उतरवायला बरोबर थोड्याफार कुकीज असतातच. अलीकडेच मी 'चार दिवस प्रेमाचे' हे मनोरंजक नाटक पहिले. त्यात नवरा म्हणतो " कॉफी कशी, गॅसवरून डायरेक्ट नरड्यात उतरली पाहिजे ". यावर बायको उत्तर देते " हो का sss ?? मग नरडंच ठेवुयात गॅसवर"😅. यातली अतिशयोक्ती आणि विनोद सोडून द्या. पण यातल्या 'नवऱ्या'चं आणि माझं अगदी एकमत आहे. मध्यंतरी माझे साडू मला म्हणाले कि ते एकदा आसामला गेले असताना त्यांच्या एका 'असामी' मित्राने त्यांची खास चहा बनवण्याची पद्धत सांगितली. आसाम म्हणजे चहाची मक्काच !! मग तिथला मौलवी काय सांगतो, म्हणून मी कान टवकारून ऐकू लागलो . तर ते असे .... ''आधी पाणी पूर्ण उकळून गॅस घालवून टाकायचा आणि मग त्यात चहाची पत्ती टाकायची''. फुस्सssss!!  मी म्हटलं जमणार नाही. चहा पुरेसा उकळल्याशिवाय  मला किक नाही येणार. शेवटी तुमच्यावर जे संस्कार आहेत, त्याचा पगडा असतोच. एव्हढंच काय पण मला चहा खाली उतरवल्यावर साखर घातलेली देखील आवडत नाही. ती उकळतानाच घातली पाहिजे. माझी आई आधी चहा उकळवायची आणि त्या पातेल्यावर २-३ मिनिटे झाकण ठेवून द्यायची. ह्याला चहा मुरणे असे म्हणतात. आणि मग त्यामध्ये दूध घालायची. तेव्हा मला हे कधीच खटकलं नाही. पण आता नाही चालत. 

पंचतारांकित हॉटेलात जो चहा देतात तो 'लाईट टी' किंवा 'डीप टी' देखील काहीही कामाचा नाही. (तो घेतल्यावर मीटिंगमध्ये मला हमखास झोप यायची). आधीच लाईट असलेला चहा त्यात milkarच्या २-३ टोपणातले थंड दूध घालून आणखी बेचव करायचा असतो. आणि त्यात थोडी 'किक' शिल्लक असेल, तर २ शुगर क्युब्स घालायचे ( आणि हा चहा पिऊन वानप्रस्थाश्रमात जायचे😆). मला चहा 'थंड' झालेला अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा तो बेसिनमध्ये ओतून टाकणे मी पसंत करेन. १ तासाने पुन्हा गरम केलेला चहा देखील जरा  वेगळाच  लागतो. तसेच माइक्रोमध्ये कपासहीत गरम केलेला चहा मी नाही म्हणायला क्वचित घेतो, पण मला ते फारसे रुचत नाही. कारण चहामुळे जिभेला चटका बसतो, ते ठीकच आहे. पण मायक्रोत गरम केलेल्या कपामुळे मात्र आधी ओठांना चटका बसतो. आधी 'शिक्षा' आणि  मग 'इच्छापूर्ती' असे हे विचित्र गणित आहे. थंड करून चहा पिणारे लोक 'चहा' का पितात तेच समजत नाही.  ( डॉ. काशिनाथ घाणेकर अशा चहाला 'पिचकवणी' असा शब्द वापरत. हा खास कोकणी शब्द आहे. पण हा चहा विंगेत आमच्यासाठी खास नटसम्राटांनी मागविला असल्याने आम्हाला तो 'अमृततुल्य' वाटला. After all, Company matters!!). 

कंपनीचा विषय निघालाय म्हणून आठवले. पूर्वी आम्ही 'SOCIETY' हा ब्रँड घ्यायचो. पण का कोण जाणे, ४ वर्षांपूर्वी नवीन 'सोसायटी'त राहायला आल्यावर हिने 'वाघ बकरी ' आणायला सुरवात केली. (ह्या ब्रँडचा आमच्या दोघांच्या स्वभावाशी दुरान्वयानेही संबंध नाही. कारण तसे असते, तर 'वाघीण-बकरा' असे लिहिणे योग्य झाले असते😜). मला 'वाघ बकरी' हा ब्रँड पसंद आहे. रेड लेबल आणि ब्लॅक लेबलकडे मी साधे पाहत सुद्धा नाही. LIPTON टी  ओठाला सुद्धा मी लावत नाही. ताज चहाचा आणि माझा संबंध झाकीर हुसेनचा तबला ऐकण्यापुरताच आहे. Brookbond चा आणि माझा संबंध फक्त शेअर मार्केट पुरता आहे. असो ! काही जहाल लोक तर दूध न घालता तसाच चहा 'ब्लॅक टी' म्हणून पितात. माझ्या मित्राने एकदा खास लंडनहुन आणलेला ब्रिटिश चहा दिला होता. पण तो पूर्ण पॅक काही आम्ही दोघे संपवू शकलो नाही. इनर्ट गॅसचे वर्णन जसं 'टेस्टलेस ओडरलेस कलरलेस' करतात ना, तसा हा चहा होता. तसेच एकदा कूर्गला गेलोतो तिथल्या चहाच्या फॅक्टरीमधून आम्ही मुद्दाम चहाची पत्ती आणली होती. तो देखील आम्ही खूप ऍसिडिक असल्याने पूर्ण संपवू शकलो नाही. एअरपोर्टला फ्लाईट delay झाली तर, मी तिथल्या स्टॉलवर जाऊन सरबते किंवा ज्यूस घेण्यापेक्षा आईस-टी घेणे पसंद करतो. मसाला टी हि कल्पना मला मान्य आहे; पण तो बासुंदीसारखा असू नये. वेळ पडल्यास मी रस्त्यावरील गाडीवरचा चहा देखील आनंदाने घेतो. मुख्य म्हणजे तो खूप उकळलेला असतो. शिवाय तो चहावाला आधीच दूध घातलेला तो चहा ३-४ वेळा उतू जाईपर्यंत वर आणतो  आणि नंतर भांगे सारखा २ फुटांवरून कपात ओततो ते दृश्य पाहायला मला फार मौज येते. 

हल्ली तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे चहा आलेत बाजारात, काही विचारू नका. मुख्यत्वेकरून ही सगळी ह्या डाएटवाल्यांची थेरं आहेत. मिंट ग्रीन टी , पीच डिटॉक्स , लेमनग्रास काय , ऍपल cinnaman  काय ,एक ना अनेक फ्लेवर आहेत. ह्या चहांना 'चहाचा' सोडून बाकी सगळे फ्लेवर असतात. (मला वाटतं जयश्री टी. आणि मीना टी  सोडून मी सगळ्या 'टीं 'चा विचार केलाय इथे 😜). मी दुबईला असताना माझे एक मित्र मला घरी नेऊन एक विशेष पंचामृती चहा माझ्यासाठी करायचे. मला आठवते कि त्यामध्ये ते डेट सिरप, मध आणि लिंबू घालायचे. एव्हढा चविष्ट चहा मी अन्यत्र कुठेही घेतलेला नाही. मी पूर्वी काही स्टील मर्चंट्सना भेटायला गोल देऊळ, मोहम्मद अली रोडला जायचो, तेव्हा स्टीलच्या छोट्याश्या ग्लासमधला तिथला खास कटिंग टी पण बराच घेतलाय. मुख्य म्हणजे दुसऱ्या छोट्या पातेल्यात उलट्या ग्लासमध्ये तो चहा आलेला असतो. तो ग्लास हाताला चटके न बसता, सुलटा करून चहा पिणे हे एक टेक्निक असते. म्हणजे चहासारख्या पदार्थात देखील आपले ( नव्हे आमचे ) किती 'चोचले' असतात हे जाणवते. पण हे वर्तन एका चहावाल्याच्या देशात नक्कीच शोभनीय आहे.....नाही का ??


पोहे

पोहे हा ब्रेकफास्टचा अस्सल मराठी पदार्थ !! आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे वाटणाऱ्या संसारी माणसाला कांदे पोहे आवडले, तर त्यांत काही नवल नाही. पण मला मात्र वाफाळलेले गरमागरम बटाटेपोहेच आवडतात आणि ह्याचे कारण थेट आमच्या आजोबांपर्यंत पोचते. गिरगावातल्या साहित्यवर्तुळाचा अड्डा असणारे कुल्कर्ण्यांचे प्रार्थना समाजाजवळचे उपहारगृह जरा आठवून बघा. इथे आमचे आजोबा ( म्हणजे आईचे काका) मॅनेजर होते. साठा-सहामाशीला आम्ही त्यांना भेटायला जायचो, तेव्हा हाटेलच्या मागल्या बाजूला वेगळ्या VIP दालनात ते आमची बसण्याची सोय करायचे. तिथे बसून आम्ही गरमागरम बटाटेपोहे आणि बटाटे भजी हे कुलकर्ण्यांचे flagship पदार्थ यथेच्छ हादडायचो. तेव्हापासून पोहे म्हणजे 'बटाटे पोहे'च असतात असे काहीसे समीकरण डोक्यात पक्के बसलेय.  (आणि त्या निमित्ताने आजोबांचीही याद हळवे करून जाते ). असं असलं तरी, ह्या बटाटेपोह्यांचा 'गप्पांचा फड' रंगविण्यासाठी काही उपयोग नाही. कारण एक बशीभर बटाटेपोहे संपवायला तुम्ही जास्तीत जास्त ५ मिनिटे घेऊ शकता. नाहीतर ते पंख्याचा वारा लागून 'वारडतात' आणि असे पोहे खाण्यात काही चार्म राहत नाही. 'गप्पांचा फड' रंगविण्यासाठी दडप्या पोह्यांची व्यवस्था उपयोगात येते. ते कितीही वेळ खात बसले तरी चालते. ह्या पोह्यांमध्ये गाण्यातल्या घराण्यांप्रमाणे बरीच व्हरायटी तुम्हाला सापडेल. काही ठिकाणी बारीक कांदा आणि तिखालालची तिखट पावडर एव्हढ्यावरच लोक दडपे पोहे करतात. ह्या पोह्यांचा रंग गुलबट असतो.  आमच्याकडे पोहे, चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची एकत्र करून त्याला चरचरीत फोडणी दिली जाते आणि वरून लिंबू पिळले जाते. साने गुरुजींनी 'हाताचे पोहे ' म्हणून जो पदार्थ सांगून ठेवला होता ( ज्यामध्ये गोडा मसाला घालतात) त्याचेही ह्या दडप्या पोह्यांशी खूप साधर्म्य आहे. दडपे पोहे अधिक लिज्जतदार करण्यासाठी काही लोक वर दिलेल्या सरंजामांव्यतिरिक्त फरसाण, टोमॅटो, प्रसंगी डाळिंबाचे दाणे सुद्धा घालतात आणि त्यांच्या नकळत हे पोहे आता 'भेळ' ह्या मान्यताप्राप्त खाद्यकल्पनेकडे सरकलेले असतात. त्याविषयी मी पुढे लिहिणारच आहे .... !!

ढोकळा आणि सुरळीच्या वड्या

अलीकडे इन्स्टंट ढोकळा वगैरे करून खातात म्हणे. हा शुद्ध 'स्टंट' आहे असं मला वाटतं. पण महिन्याला एक दोन लाख रुपये पगार कमावणाऱ्या गृहिणींना ही concept उपयोगी असावी. कारण त्यांना बिचाऱ्यांना वेळ खूप कमी असतो. आमच्या घरी मात्र पूर्वापार 'डाळीचे पीठ' रीतसर आंबवून हा पदार्थ केला जातो. त्यामुळे त्याचे थोडे बारीक सारीक तपशील माझ्या चांगले परिचयाचे आहेत . खमण ढोकळ्याला जाळी पडणे, हे 'तो' बनवणाऱ्याचे कसब मानले जाते. ह्यासाठी मुळात फर्मेंटेशन चांगल्या प्रतीचे होणे महत्वाचे असते. माझी पत्नी सांगते कि ह्या आंबवलेल्या पिठात तळाशी थोडा कांदा ठेवल्याने पण ढोकळा जाळीदार होतो.  १९७५ पूर्वी आम्ही गिरगांवात रहात असताना माझी आई क्वचित कधीतरी बाहेरून ढोकळा आणीत असे. आमच्या  झावबावाडीच्या नाक्यावर फरसाणाचे एक कळकट्ट दुकान होते. आश्चर्य म्हणजे तिथून तो ढोकळा आणला जाई. (पुलंनी म्हटल्याप्रमाणे पदार्थाची चव ही 'हाटेल'च्या स्वच्छतेच्या व्यस्त प्रमाणात असते, हे वचन ह्या दुकानालाही लागू आहे). खाणार्याच्या लालोत्पादक ग्रंथी उत्तेजित करण्यासाठी फोडणीबरोबर मिरचीवजा आणखीही काही सरंजामें त्यावर तो घालत असे. विक्रीला ठेवलेल्या  ढोकळ्यावर  माश्या बसू नयेत म्हणून अर्धगोलाकृती जाळीचे एक झाकण ठेवलेले असे. ( अलीकडे ही जाळी मात्र फारशी बघायला मिळत नाही. किंवा आपण अशाच कळकट दुकानात गेलो तर मिळेलही पाहायला. कारण माशा काही संपावर गेलेल्या नाहीत ). तर त्या चवदार ढोकळ्याची चव आणि संस्कार अजूनही माझ्या जिभेवर आहे. त्यामुळे आजही घरी तयार केलेला खमण ढोकळा प्लेटमध्ये घेतल्यावर, मला त्याचा जाळीदार भाग बघायला आवडतो. ही जाळी त्याचे 'ढोकळेपण' सिद्ध करते. 'जाळी पडणे' हा एक ढोकळा उत्तम झाल्याचा निकषही समजला जातो. एकदा हा जाळीदार ढोकळा बनला , कि त्यावर फोडणी, ओले खोबरे , कोथिंबीर घालून तो खाण्यास योग्य होतो. आपल्या आजच्या आवडीनिवडींचा उगम संस्कारात कसा खोलवर दडलेला असतो, ह्याचा हा उत्तम नमुना !!


सुरळीच्या वडीला मी 'खमण ढोकळ्या'ची बहीण मानत आलोय. पण ही वस्तू स्त्रीलिंगी आहे म्हणून कि काय, पण ती करायला जास्त complex आहे. (ढोकळा कसा पुरुषांसारखा 'मोकळा ढाकळा' असतो ). सुरळीच्या वड्या इतक्या नाजूक साजूक असतात; करायलाही आणि खायला देखील !!. फक्त उच्च प्रतीची सुगरणंच त्या करू शकते. ह्या बाबतीत मी इतका टोकाला गेलो आहे, की बाहेरून आणलेल्या 'सुरळीच्या वड्या' मी कधीही उष्टावत सुद्धा नाही. ओलं खोबरं, कोथिंबीर आणि किंचित साखर ह्यांचं सारण भरलेली तुकतुकीत कांतीची सुरळीची वडी ही 'मस्तानी'च्या नाजूक कंठाइतकीच पारदर्शक दिसली पाहिजे.  हे BARC spec सांभाळणं कमालीचं अवघड आहे. माझी पत्नी आणि बहीण ह्या दोघीही सुरळीच्या वड्या सुरेख करतात. आमच्या मातोश्री देखील करायच्या, पण जरा अभावानेच.  गम्मत म्हणजे एकदा खायला सुरवात केल्यावर हा पदार्थ इतका गपागप संपतो कि त्यामागे गृहिणीने घेतलेली किमान तासाभराची मेहनत ५ मिनिटात संपवण्याची ताकद ह्या पदार्थात आहे. ह्या बाबतीत मात्र सुरळीची वडी ही गोलगप्प्याला आणि "चितळ्यांच्या बाकरवडी'लाही मागे टाकते. ही वडी उत्तम झाली, म्हणजे गृहिणीचे मूड वगैरे सगळे 'आलबेल ' किंवा 'सुरळीत' आहे असे समजायला हरकत नाही. 😆


बटाटे वडा

अस्सल मराठी रसिक खवय्याला खाताना बेभान करणारे 'बटाटे वडा' हे खाद्य किती जुनं आहे, ह्याचा तपशील माझ्याकडे नाही. पण माझ्या नाबाद ५९ वर्षांच्या इनिंग मधली निदान ५० वर्षे तरी ह्या खाद्याने मला खाण्यातला कदाचित क्षणिक पण स्वर्गीय आनंद दिलाय. असे म्हणतात कि दादरच्या अशोक वैद्य यांनी १९६६ साली दादर स्टेशनच्या बाहेर पहिला वडा पावचा स्टॉल टाकला होता. खरं म्हणजे हा वडा पाव आणि मिसळ पाव ह्या दोन गोष्टी आर्थिक दुर्बल घटकांसाठी सुरु झाल्या होत्या. पण आमच्यासारख्या पांढरपेशा वर्गाने त्यावरही यथेच्छ ताव मारून त्यांचे भाव वाढवले आणि मूळ उद्देश नाहीसा झाला. १९७५च्या आधी आम्ही गिरगांवात असताना आमच्या लहानपणी माझी आई कधीतरी बाहेरून येताना बाहेरून आम्हां सर्वांसाठी बटाटेवडा आणीत असे. (माझी आई तेव्हा क्लासला जाऊन external SSC करत होती. त्यामुळे घरातील मुलांना येताना काही ना काही खाऊ आणायचीच). वर्तमानपत्रात गुंडाळलेले साताठ घरगुती वडे आणि लसणीची चटणी असे पार्सल घेऊन आई आमच्या छोट्याश्या घरात शिरली कि लगेच घमघमाट यायचा नुसता. लगेचच आम्ही भावंडे तिच्या पिशवीचा ताबा घ्यायचो. मग अवघा आनंदी आनंद असे. आम्ही ह्या वड्याचे नामकरण 'रहाळकरणीचा वडा' असे केले होते. बरेच दिवसपर्यंत मी रहाळकरबाईंना पहिले देखील नव्हते. कारण ही डिश आमच्याकडे उठसुठ न आणता 'पर्वणी' म्हणूनच येत असे.  मग एके दिवशी आईबरोबर मी असताना त्यांचे दर्शन झाले. ठाकूरद्वार नाक्यावरून पालशेतकर सोनारांकडे जाणाऱ्या रस्त्यावर ह्या बाईंचे मुख्यत्वेकरून कांदे बटाटे रताळी अळू , अळकुड्या विकण्याचे प्रशस्थ दुकान होते. अशा जमिनीच्या खालून वर येणाऱ्या भाज्यांच्या दुकानात वरून स्वर्गातून खाली पृथ्वीवर अवतरलेले 'बटाटेवडा'  हे 'खाद्य मिळत असे. अर्थातच हा जोड-धंदा होता आणि तोही मार्केटिंग वाल्यांच्या भाषेत सांगायचं तर व्हॅल्यू ऍडेड, निष प्रॉडक्ट .... आणि  तेही फॉरवर्ड ईंटीग्रेशन करून !!😆 ह्या चाळीशीत असलेल्या बाई त्या काळातही  एकट्या हा बिझिनेस करीत असत ( म्हणजे पराक्रमीच बाईं होती ही !!). पदार्थाच्या नाविन्यामुळे आम्हाला तिच्याकडचे वडे अगदी चवदार लागत.  तिच्या हाताला उत्तम चव देखील असावी.  बाहेरील प्रशस्थ दुकान आणि आतल्या बाजूस असलेला तिचा छोटेखानी भटारखाना ह्यामध्ये एक दरवाजा, असे नेपथ्य होते . ह्या दरवाज्याच्या उंबऱ्यातच बसून ह्या बाई आलेले भाजीचे गिऱ्हाईक आणि एकीकडे आमच्यासारखे आलेले बटाटेवड्यांचे क्लायंटहि सांभाळत. असो... तर माझ्या बटाटेवड्याच्या चोचल्याचा उगम हा असा गिरगावातील आहे. पण नंतर नंतर आई घरीच बटाटेवडे करीत असे (बहुदा बाबांच्या सांगण्यावरून असेल). ती अन्नपूर्णा असल्यामुळे वडे चविष्ट बनवत असे, ह्यात वाद नाही. पण बाहेरच्या वड्यासारखी किक मात्र येत नसे. 'बटाटेवडा' हा आमच्या संगीताच्या भाषेत सांगायचं तर उत्तरांगीप्रधान राग आहे. उत्तरांगीप्रधान 'सोहोनी' राग पुरियासारखा मंद्र सप्तकात गायला तर त्याची लिज्जत रहात नाही. त्यासाठी सारखा वरचा 'षड्ज' लागलाच पाहिजे  ( म्हणजे मिरचीचा झटका !! ). हे तामसी खाणे आहे असे अध्यत्मातले लोक म्हणतात, ते काही उगीच नाही. 

त्यानंतर आम्ही गिरगावातून ठाण्यात राहायला आलो आणि माझी भेट आत्ता TJSB आहे ना, तिथल्या गजानन वडापाववाल्याशी पडली. ती देखील माझ्या अकराव्वी बारावीतल्या मित्रांबरोबर!! मित्रांबरोबर वडापाव खाण्यातली गोडी ज्याची तोच जाणे. आम्हाला मिळणाऱ्या पॉकेटमनीमध्ये १५ पैशांचा वडापाव सहज यायचा. ह्या साक्षात गजाननाने भक्ताला दाखवलेला 'नैवेद्य' प्राशन करायचा आणि तेव्हढ्या इंधनावर आम्ही सगळे तलावपाळीला चार  
पाच चकरा सहज लावायचो. दुर्दैवाने एके दिवशी तिथून 'गजानन' हलला आणि आम्ही सगळे 'आतून' हललो. त्यानंतर काही महिने विसर्जन केल्यासारखा हा 'गजानन' भूमिगत होता. आता ह्या गजाननाची प्रतिष्ठापना नव्याने विष्णूनगरमध्ये झाली आणि हां हां म्हणता त्याने पूर्वीसारखा जम बसवला. पूर्वी नुसतीच लसणाच्या चटणीची भुकटी देणाऱ्या ह्या महाभागाने आता स्पेशल पिवळ्या ओल्या चटणीची रेसिपी बनवली, जी आजतागायत कुठल्याही गृहिणीला बनवता आलेली नाही. अर्थात ही ओली चटणी घेण्यासाठी वर्तमानपत्रांच्या ऐवजी विशिष्ट प्रकारचे द्रोण आले. माझ्या मते त्याने वड्याचीही रेसिपी बदलली होती. पूर्वीसारखा तांबूस रंगाचा वडा न देता आता वड्यालाही 'पिवळा' रंग आला. वड्याबरोबर अतरंगी लोकांसाठी  'होश' उडवणारा हिरव्या मिरचीचा ठेचाही तो देऊ लागला. हे बेमालूम कॉम्बिनेशन गजाननवाला निदान २५-३० वर्षे तरी सहज विकतोय. विष्णुनगरमध्ये ट्राफिक जॅम करू शकेल इतकी वड्यातील दर्दी लोकांची गर्दी हे दुकान जमवते. त्याला ठाणेकरांची  'नाडीपरीक्षा' उत्तम झाली होती, हेच खरे !!

विष्णूनगर - घंटाळी परिसरातले वड्याचे दुसरे तीर्थक्षेत्र म्हणजे 'श्रद्धा वडापाव' !! काय असेल ते असो, पण गजाननच्या तुलनेत श्रद्धाचा वडापाव मला चटक लावणारा मुळीच वाटत नाही. पण 'बायको' माझ्याबरोबर असताना प्रचंड खरेदीनंतर ( म्हणजे 'साडी' हे वेगळे सांगायला पाहिजे का..??) राम मारुती रोडच्या गर्दीतून वाट काढून त्रासलेल्या नवऱ्यांसाठी हा जॉईंट 'विरंगुळा' म्हणून नक्की छान आहे, असे मत इथे नोंदवण्याचे धाडस मी करतो. कॉलेजमध्ये गेल्यावर आणखी एका 'वडा रेसिपी'ने आम्हाला वेड लावले होते. तो म्हणजे 'कुंजविहार'चा वडा !! हॉटेलची स्वच्छता बाहेरून बघून जे हॉटेलात जातात, त्यांना ह्या वड्याची मजा कळणार नाही . (घरंदाज गायकी गर्वाने ऐकणाऱ्या लोकांना गजल कशाशी खातात ते कळत नाही, त्यातलाच हा प्रकार आहे). स्टेशनच्या समोर असलेल्या ह्या हॉटेलने मुंबई लोकलच्या तीन गुणांशी इमान राखलंय. १. गर्दी : कायम गर्दी असलेलं हे हॉटेल आहे. त्याचे मुख्य कारण इथे मिळणारा स्पेशल 'वडा' हे आहे. २. तुम्ही ह्या हाटेलात शिरल्यावर जागा मिळणे, हे लोकलमध्ये बसायला जागा मिळण्याइतकेच दुरापास्त असते. त्यामुळे बसलेल्या लोकांना "सरकून घ्या" असे सांगून, चौथ्या सीटवर बसून वडा खाण्याची तयारी हवी. हे व्हाईट कॉलरवाल्यांचे काम निश्चितपणे नाही.(मी कधी गेलोच तर मुद्दाम निळा शर्ट घालून जातो)😅.  ३. ह्याचे मेनूकार्ड लोकलवर स्टेन्सिल करून लावलेल्या कर्जत, अंबरनाथ लोकल्सच्या जीर्ण पिवळ्या बोर्डसारखे आहे. इथे पाव ही गोष्ट वड्याबरोबर नाही, तर मिसळीबरोबर जास्त चालते. इथे जास्त कौतुक आहे ते वड्याबरोबर बशीतून किंवा प्लेटमधून येणाऱ्या चिंच-गुळाच्या चटणीचे !!  वड्याचा निदान ४० टक्के भाग जर ह्या चटणीत बुडालेला नसेल, तर तुम्हाला इथल्या वड्याची लिज्जतच कळणार नाही. हा 'बसंत-बहार' सारखा जोड राग आहे. इथे वड्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. आता हे करोना प्रकरण संपल्यावर एकदा त्याचा जम्बो वडापाव खायचाय....खूप जाहिरात करतोय लेकाचा !!  अजूनही ३-४  बटाटेवड्यांचे चांगले जॉईंट्स आहेत ठाण्यात. उदा. गोखले स्नॅक्स,  कुलकर्णी वडासम्राट, राजमाता वडा पाव , दुर्गा स्नॅक्स , वगैरे. आमच्या गिरगावातल्या रहाळकरींण  बाईंसारखा अगदी घरघुती वडा खायचा असेल, तर तुम्ही ए. के. जोशी हायस्कुलच्या गल्लीत शिरा. तिथे जोशी बाई नावाच्या सत्शील गृहिणी गाडीवरती  स्वच्छ सामुग्री वापरून घरच्यासारखे वडे बनवतात. ह्यामध्ये सोडा नसतो हे विशेष नमूद करावे लागेल. फक्त चितळ्यांच्या दुकानासारखे इतरांची तंद्री लागलेली पहात ५ मिनिटे थांबावे लागेल😆.Good things take time...you see !!

आता जरा मुंबई-पुण्याकडे वळूयातछबिलदासचा वडा दादरमध्ये शोभून दिसतो. पण तो  कधी चुकून ठाण्यात आला, तर त्याला न्यूनगंड येईल. तुम्ही नंतर मसाला दूध किंवा पियुष मागवणार असाल, तर दादरच्या पणशीकरकडे त्यांचा सात्विक बटाटेवडा जरूर आधी खायला हरकत नाही. चांगले कॉम्बिनेशन आहे. शिवाय आमचे आणि पणशीकरांचे पेढे, मसाला दूध, दुधी हलवा आणि पियुष ह्या विशेष गोष्टींमुळे खूप जुने संबंध आहेत. अगदी अलीकडच्या काळात मी दादर माटुंगा कल्चरल सेंटर मध्ये एका कार्यक्रमाच्या मध्यंतरांत 'मयुरेश केटरर'चा बटाटेवडा खाल्ला तो खरोखरंच वाखाणण्यासारखा होता. कर्जतचा वडा चांगला का लागतो ह्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे कल्याण सोडल्यावर प्रवाश्यांना गाडी थांबून जीवसृष्टी बघायला मिळते ती एकदम कर्जतला. ( सॉरी, 'नेरळ' हे दिवाळीतल्या भाकड दिवसासारखे 'भाकड स्टेशन आहे असे  मी मानतो. ज्यांची इथे फार्म हाऊसेस आहेत त्यांनी मला क्षमा करावी ). शिवाय कल्याण-कर्जत ह्या ४५ मिनिटांच्या प्रवासात आपल्या बाजूला बसलेले प्रवाशी आपल्याला विविध तऱ्हेने किती त्रास देतातायत, गॅंगवेमध्ये किती लोक उभे राहतायत, आपल्याला नको असेल तरी पुढचे लोक खिडकीची काच वर करतायत किंवा नाही,  एकाच फॅमिलीतले ४-५ लोक घरी असल्यासारखे किती पटर पटर करतायत ह्या सगळ्याचा अंदाज कर्जत येईपर्यंत आपल्याला येतो. ह्यातील कुठल्याही एका संकटावर आपण कर्जतचा वडा खाऊन मात करू शकतो. थंडी असेल तर हा वडा जास्त खपतो. बटाटेवड्याची आपल्याला लागणारी चव ही स्थळ-काळ-वेळ- कंपनी ह्यावर अवलंबून असते.  मुंबई-पुणे प्रवासात लागणारा दत्तवडा मला बरोबर रसिक कंपनी असेल, तरच आवडतो. कल्याणच्या मंडळींना फक्त 'खिडकीवडा'च जर आवडत असेल, तर 'देव त्यांचे कल्याण करो' एव्हढेच मी म्हणेन.  तुमचे अगदीच ग्रह फिरले असतील, तर तुम्हाला उडप्याकडे जाऊन बटाटेवडा खावा लागेल. मुंबईत मी ही चूक करत नाही. पण कर्नाटकात गेलो कि सांबारचा नॉशिया घालवण्यासाठी आलू बोन्डा नावाचा विपरीत पदार्थ मी कधीतरी ऑर्डर करतो. आमच्याकडे आळशी माणसाला आळसबोन्डा का म्हणतात ते त्यामुळे कळलं. आलू बोन्डाबरोबर सांबार देणे हा बटाटेवड्याचा अपमान समजतो मी. असो !! वडापाव ह्या डिशला बाँबे बर्गर असं म्हणून काही आचरट 'पाववाल्या' लोकांनी हेवा वाटून सूड उगवलाय असं मला वाटते.  पुण्यात जोशी वडेवाल्यांनी जागोजागी स्टॉल उघडलेत. पण त्यांच्या बटाटेवड्यावर पुणेकर खुश आहेत कि नाही, हे अजून अधिकृतपणे कळलेले नाही. अजून तरी ह्याला कुणी "जगात भारी" असं म्हटल्याचं ऐकिवात नाही. त्यातल्या त्यात पुण्यामध्ये बटाटेवडा खाण्याची वेळ माझ्यावर आलीच, तर मी टिळक रोडवरच्या बादशाही मध्ये जाईन. बाहेरचे आवरण केवळ आतील सारणाच्या लज्जारक्षणापुरते ठेवून केलेल्या ह्या बटाटेवड्याची चव आगळीवेगळी आहे. ह्याला मी सात्विक वडा म्हणतो. 'चटणी' म्हणून ताकात कालवलेला ठेचा दिला जातो इथे. अत्यंत निर्विकारपणे सर्विंग केले जाईल इथे. "खायचे असले तर खा, नाहीतर पळा" हा इथला पुणेरी खाक्या !!( ... 'फुटा' असे सौजन्याने म्हटलेले नाही). मी आत्तापर्यंत शेकडो ठिकाणी 'बटाटेवडा' हाणलाय. त्यामुळे माझी वड्याची 'चव' आता समृद्ध झालेय. ह्या अनुभवावर गीतेशप्पथ पण गर्वाने मी सांगू शकतो कि "बटाटेवड्याची हेडक्वार्टर ही आणखी कुणीकडे नसून  ठाण्यातच आहे आणि आमची कोठेही शाखा नाही" !!😅

वर लिहिल्याप्रमाणे बटाटेवड्याची लिज्जत अधिक वाढविण्यासाठी रेसिपी व्यतिरिक्त वातावरण निर्मितीचाही खूप मोठ्ठा वाटा असतो. उदा. काळ वेळ स्थळ, कंपनी , भूक वगैरे. ह्या संदर्भात २ किस्से मी लिहिणारे इथे. माझा एके काळचा मित्र कै शेखर अभ्यंकर ( उर्फ तात्या ) ह्याने मला त्याची एक मनोरंजक कहाणी ह्या संदर्भात मला सांगितली होती . ती त्याच्याच शब्दात ऐका. "अरे विकास, मी पूर्वी दर वर्षी निदान एकदा तरी निर्जळी करायचो. पण गेल्या वर्षी जाम गोची कशी झाली ती ऐक. सकाळी सहा वाजता उठलो. ब्रशिंग वगैरे करून पेपर वाचत बसलो होतो. आईला माहिती होतं कि माझी आज निर्जळी आहे. त्यामुळे तिने स्वतः चहा करून घेतला आणि मला ऑफर करण्याचा प्रश्नच नव्हता. मी शांत होतो. नंतर १० वाजता  तिने पोहेही करून घेतले  . तेव्हाही मी एक आवंढा गिळून निमूटपणे माझी कामे करत होतो. दुपारी एक वाजेपर्यंत मी पाण्याचा एक थेंबही घेतला नव्हता. माझी मीच पाठ थोपटली. म्हटलं च्यायला, जमणार आज आपली निर्जळी. दुपारच्या जेवणात भाजी माझ्या आवडीची नसल्याने तीही वेळ मी निभावली. मग कंटाळून चार वाजेपर्यंत झोप काढली. खरं सांगायचं तर पोटात कावळे ओरडत होते. म्हटलं  च्यायला निदान पाणी तरी घ्यायला हवं होतं रे. पण आता केलाच आहे निश्चय, तर दामटूयात पुढे अजून. घरी डोकं भणभणायला लागलं. म्हणून त्याच सैरभैर अवस्थेत बाहेर पडून गोखले रोडला फिरायला आलो. मग ए. के. जोशी शाळेच्या गल्लीत शिरलो. इथेच मोट्ठी चूक झाली रे !! कारण पुढे शंभर मीटरच एक बटाटेवड्याची गाडी होती. त्याचा वास भसकन माझ्या नाकात शिरला आणि आता मात्र माझा बांध फुटला. मी म्हटलं निर्जळी वगैरे सगळं झूट आहे, आपल्याला पाहिजे ते खाणं हेच खरं जीवन ! सरळ त्या गाडीवर गेलो आणि एका मागोमाग एका गपागप दहा बारा वडे हाणले रे !! अरे , काय जीव शांत झालाय म्हणून सांगू ?? हा: हा: हा:ssss "(  पुढे अर्ध्या मिनिटाचे रावण स्माईल ...😆😆😆😆.)

आपल्याकडे लग्नाच्या पंक्तीत देतात तो मिनी बटाटेवडा हा क्रिकेटमधल्या बाराव्या खेळाडूसारखा असतो. जर जेवणातले ३-४ पदार्थ बिघडले, तरच तो भाव खाऊन जातो. सहसा बटाटेवडे हे सकाळी न करता संध्याकाळच्या न्याहारीला केले, तर त्यांची लिज्जत अधिकांश वाढते. एकदा मी कंपनीच्या कामाला पुण्याला गेलो होतो. माझी सख्खी बहीण सौ  विद्याताई पाध्ये ही निगडीला राहत असल्याने मी तिच्या घरी राहिलो होतो. माझे काम चाकण औद्योगिक वसाहतीत होते जे निगडीपासून किमान २० किलोमीटर आहे . म्हणून मी टॅक्सी केली. काम छानच झाले आणि सायंकाळी  ६ वाजता अचानक बारीक पाऊस रिपरिपु लागला. परतीच्या प्रवासात आमची गाडी नेमकी एका बटाटेवड्याच्या स्टॉलवरून गेली. शेखरसारखाच माझ्याही नाकात वड्यांचा वास तपकिरीसारखा घुसला. त्या पावसाळी वातावरणात मला गाडीतून उतरून वडे खायची इच्छा अनावर झाली होती. पण चाकणच्या त्या स्टॉलचे कळकट्ट आरोग्य पाहता , मी इच्छा मारून टाकली आणि सरळ ताईच्या घरी आलो. संध्याकाळचे ७ वाजले होते. घरी पाय ठेवतोय, तोच काहीतरी तळण्याचा स्वाद दरवळत होता. तुमचा विश्वास बसणार नाही, पण त्या दिवशी रात्रीच्या जेवणात कुणीही न सांगता ताईने बटाटेवडेच केले होते. चाकणपासून आळंदी जवळ असल्यामुळे कि काय , माऊलीला सगळं कळलं होतं. हा अनुभव माझ्या अध्यात्मिक ब्लॉगवर मी लिहिणार  आहे ..."जो जे वांछील तो ते लाहो ...!"- इति माऊली 🙏

भेळपुरी 

अगदी लहानपणापासून गिरगांव चौपाटीवरच्या भैय्यांकडून ओली भेळ खात आल्यामुळे, मला सुकी भेळ ही कल्पना अजिबात मान्य नाही. अहो काय सांगू तुम्हाला ?? दीक्षित-दिवेकरांच्या आहारी गेलेले काही महाभाग आता तर आता "भेळ नको पण वजन आवर... " असं म्हणून नुसत्या चुरमुऱ्यांना ''भेळ'' मानू लागले आहेत.  अस्सल मुंबईकराला भेळ-पुरी आवडते (नुसती भेळ नाही ). तसेच तो कारण नसताना भेळपुरीचा अव्हेर करून शेव-बटाटा-पुरी, पाणी पुरी , दहीपुरी, रगडा-पॅटिस असले derivatives किंवा चाट खाऊन आपला जीव रमवत नाही. त्याला तल्लफ आली, कि तो भेळपुरी खाल्ल्याशिवाय सेटल होत नाही. अर्थात, मी देखील अस्सल मुंबईकर असलो, तरी अलीकडच्या काळात वेगवेगळ्या खाऊ गल्ल्यांत 'चाट'चा अंतर्भाव झाल्यामुळे आपली खाद्य संस्कृती अधिक समृद्ध झाली आहे असे मी मानतो. 

आम्ही गिरगांवात असताना माझी आई तिच्या काही खास तरकीबी  वापरून घरच्या घरी भेळ करीत असे. मला फार चिंच चालत नाही, म्हणून माझी पत्नी टोमॅटो केचप प्रमाणात वापरून छान भेळ बनवू शकते ( आम्ही हार्मोनियमवर मिंडेचा भास असाच निर्माण करतो ). हल्ली हळदीराम, कल्याण भेळ वगैरे वेगवेगळ्या ब्रॅंड्सची भेळीची रेडिमेड पाकिटे उपलब्ध आहेत. टपोरी लोक सोडून सगळ्यांनाच हल्ली उपलब्ध वेळ कमी असल्यामुळे ही 'रेडिमेड'ची इंडस्ट्री फोफावत आहे. त्याच्या आपण फार आहारी जाऊ नये असं मात्र वाटतं. आणि कुणी गेलंच आहारी तर ''जनरेशन गॅप''च्या नावाने बोटे मोडता येतातच. ते काहीही असो, भेळपुरी खाण्यातला आनंद मात्र कमी होता कामा नये. असो !!पुण्यामध्ये ओल्या भेळीत उकडलेला बटाटा न घालता, शेंगदाणा आणि जाडी शेव मात्र सरोबरीने घालतात ते मला पूर्ण अमान्य आहे. आणि to make the things worse, ही भेळ 'जगात भारी आहे' असे मानणाऱ्या पुण्यातल्या तरुण पिढीबरोबर खावी लागते. पण माझी पत्नी 'पुणेरी' नसली, तरी पुणे साईडची असल्याने ते मी कसबसं चालवून घेतलंय. माणसाला प्रारब्धापोटी काय काय त्रास सहन करावे लागतील हे खरंच सांगता येत नाही. माझा एक पुणेरी मित्र आहे बरं का. त्याचा  माझा एक ठरलेला वाद नेहमी होतो. भेळ पुण्याची कि मुंबईची ?? बुद्धिबळ खेळताना डाव जिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या नरड्यात प्रसंगी वझीर देतात, तसे मी लगेच त्याला सांगतो कि " एक वेळ मिसळ पुण्याची म्हटलंस तरी बेहत्तर, पण भेळपुरीचा जन्म मुंबापुरीतच झालाय ह्यावर कोणाचेच दुमत असू नये". अरे, कुठे शामभट्टाची तट्टाणी आणि कुठे इंद्राचा ऐरावत ...!! एक गोष्ट मात्र खाजगीतच सांगतो की ..... माझ्या मुंबईच्या अस्मितेचा कितीही आदर केला,  गिरगावातले चौपाटीवरील भेळवाले नामशेष झाल्यानंतर आता उरलेला एकमेव authentic भेळवाला म्हणजे न्यू एक्सलसीअर टॉकीज समोरचे 'विठ्ठल भेळपुरी हाऊस' !! पण त्यासाठी फोर्टात कोण जाणार ?? एव्हढ्या कारणासाठी मी आता बिस्लेरीच्या पाण्यात बनवलेली आणि आपली इम्युनिटी कमी करणारी  ठाण्यातल्या प्रशांत कॉर्नरची भेळ खातो. चांगली असते बरं का इथे भेळपुरी. कुठून धरून आणतो भैय्ये कुणास ठाऊक ... असो ! आता तर नवीन भीती मुंबईकरांना वाटू लागली आहे- ती म्हणजे करोनानंतर जर गाडीवरचे सगळे भैय्ये पुन्हा पुन्हा हात धुवून जर भेळ करू लागले, तर ती भेळ खाण्याच्या लायकीची राहील का ...??😄🙆


मिसळ

माझ्याकडे मध्यंतरी 'मिसळ'ह्या विषयावर कुठल्याही रसिकाला हळवे करील अशी एक पोस्ट व्हाट्सएप्पवर  आली. त्यातले काही मुद्दे मला खूप भावले, ते मी इथे उद्धृत करणार आहे. उदा. मिसळ खाणे एक आनंद सोहळा असतो.  ....... मिसळ भिजली की त्यावर रस्श्यातील तर्री चवी पुरती टाकावी. .......आता पुन्हा हे सर्व चमच्याने छानपैकी मिसळून घ्यावे. त्यावर बारीक कांदयाची पेरणी करावी........ आणी परमेश्वराचे आभार मानून मिसळीचा स्वाद घ्यायला सुरुवात करावी........ पावाचा छोटा तुकड़ा तोडून तो मिसळीमध्ये बुडवून तोंडात टाकावा, आणि लगोलग एक चमचा रस्श्याचा अभिषेक जिभेवर करावा. पहिला घास तोंडात जाताच रस्सा आणि मिसळ यांचा झटका जिभेवरुन थेट मेंदूच्या शेवटच्या टोकावर पोचतो. सगळ्या शरीरावर रोमांच उभे राहातात ! .......प्रत्येक घासात पाव कमी आणि मिसळ जास्त असे प्रमाण असू द्यावे. उगाच पोळी भाजी खाल्लासारखं पाव मिसळीला लावून लावून खाऊ नये.  त्यामुळे मिसळीचा विनयभंग होतो.😅" वगैरे वगैरे .. हा कुठल्यातरी अज्ञात रसिकाचा खूपच सुंदर लेख होता. 


अलीकडेच ठाण्यातील सुप्रसिद्ध मामलेदार मिसळीचे जनक श्री लक्ष्मणराव मुर्डेश्वर यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी दुःखद निधन झाले.  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मामलेदारची मिसळ ही प्रसिद्ध आहे. मला वाटतं १९७८ मध्ये

जेव्हा मला मामलेदार कचेरीतुन डोमिसाईल सर्टिफिकेट हवे होते, तेव्हा ह्या मिसळीची चव मी प्रथम घेतली. तो 'बाका' प्रसंग माझ्या चांगला लक्षात आहे. खूप कमी जागा असलेले आणि थोडे अंधारलेले हे हॉटेल होते. (Overheads कमी करून गिर्हाईकाच्या over the head फटका कसा मारायचा ते ह्या हॉटेलाकडून शिकावे). गचंडी करून आम्ही मित्र बसलो होतो. आमची ऑर्डर यायच्या आधीच रश्याची तर्री असलेल्या एका मापाच्या स्टीलच्या डिश एकावर एक लावलेल्या होत्या, त्याकडे माझी सहज नजर गेली. . त्यातील वरच्या डिशमधील तर्रीचा रंग बघूनच मला वास्तवाचे भान आले. मग आमची ऑर्डर आली. ह्या भाऊगर्दीत मिसळ फार नीर-गाठ-उकल पद्धतीने किंवा निगुतीने खाता येणे अशक्य होते ( ते सगळं पुण्यात बरं का !!). पावाचा तुकडा मिसळीत बुडवून पहिला घास घेतला.... आणि अक्षरशः ४४० वोल्ट्सचा झटका बसला. 'इकडे तर मिरची पाहिजे, आणि इकडे तर तिखट लागते' अशी तक्रार करणाऱ्या मध्यमवर्गातला 'मी' .. पाणी प्यायल्याशिवाय कसा पुढे जाणार ?? चार जणांच्या छोट्याश्या टेबलवर १६ ग्लास ठेवले होते. त्यातला आपला कुठला आहे हे सांगणे नंतर अवघड होऊन जाते, कारण अर्धी मिसळ संपल्यावर आपले 'होश' पूर्णपणे उडालेले असतात. मामलेदार मिसळ पुढ्यात येईपर्यंत तोंडाला पाणी सुटते आणि खाल्ल्यावर शरीरात जेव्हढी म्हणून रंध्रे आहेत तिथून घाम किंवा पाणी वाहू लागते. हा अनुभव ज्याने घेतला नसेल, तो अतिशय कमनशिबी!! तर अशी ही जालीम 'मिसळ', अनेक खाद्यरसिकांना अजूनही मोहात टाकते. त्यामुळेच कि काय, ठाण्या-मुंबई मध्ये अनेक ठिकाणी त्यांनी आता franchise उघडल्या आहेत.  


आमच्या ठाण्यात उत्तम मिसळ मिळत असली, तरी मी पुण्याची ह्या बाबतीतली मक्तेदारी मी मान्य करतो.  पुणेकर कोण्या एकाच मिसळीवर प्रेम करीत बसत नाही. तो रसिक आहेच, पण अल्पसंतुष्ट नाही. तो सतत नव्याच्या शोधात असतो. ( आपण फक्त मिसळीबद्दल बोलतोय....गैरसमज नसावा 🙏). त्यामुळेच कि काय तो सतत उद्यमशीलतेला प्रोत्साहन देतो. अर्थात पुण्यामध्ये किमान पंचवीसेक तरी मिसळीचे जॉईंट मिळतील तुम्हाला . असे असले तरी पुणेकरांनी एकदा तरी मुंबई -ठाण्याच्या उकाड्यात येऊन माम्लेदारची मिसळ खाण्याचा अनुभव जरूर घ्यावा ( आम्ही नाही का दादरला सिद्धिविनायक असला, तरी रांजणगावच्या गणपतीचे दर्शन घ्यायला येत पुण्याला ???). मला मिसळीतले फार काही कळते असा माझा मुळीच दावा नाही. पण काही निवडक ठिकाणच्या मिसळी मी खाल्या आहेत आणि त्यातील विशेष आवडलेल्या जॉइंट्सविषयी मी थोडक्यात लिहिणार आहे इथे. माझ्या आयुष्यात पहिली मिसळ मी गिरगावातल्या वेलणकरकडे खाल्ली. तेव्हा माझे लहानपण असल्यामुळे मला ती आवडली होती एव्हढच आठवतंय. पण त्यानंतर मी एकदम २०१० मध्ये तिथेच गेलो. तेव्हा हे त्यांचे काम नाही असं मात्र वाटलं. नुसते पोहे, उसळ, फरसाण, कांदा एकत्र केले कि मिसळ होत नाही; त्याची एक रेसिपी असते हे काही हॉटेलवाल्यांना कळतच नाही. त्यातील खाद्यघटकांचे प्रमाण, तिखटपणा, घनता आणि दृश्य रंगरूप हे त्या रेसीपीचे आधारघटक आहेत. मामलेदारकडची मिसळ खाताना जे माझ्यासारखे लोक हैराण होतात, त्यांच्यासाठी मुर्डेश्वरांनीच 'आमंत्रण' नावाचे हॉटेल काढले आणि एक डिग्री कमी तिखटाची मिसळ उपलब्ध केली.  आता 'आमंत्रण' हा ब्रँड झाला आहे. माझा मेव्हणा पुण्याहून ठाण्याला आला कि आमंत्रणची फेरी चुकवत नाही ह्यातच सारं काही आलं. मला मात्र नौपाड्यातली गोखले मिसळ सगळ्यात आवडते. कारण इथला तिखटपणा माझ्या पोटाला त्रास देत नाही. मला वाटतं मिसळ मिळणारे ठाण्यातले हे सगळ्यात स्वच्छ दुकान !! इथे कायम येणारे गिर्हाईक सहसा नौपाडा, घंटाळी, विष्णूनगर ह्या भागातले व्हाईट कॉलर लोक असतात.  इथे मिसळीपाठोपाठ उतारा म्हणून 'पियुष' देखील मिळतो.  नाही म्हणायला सुरुची मिसळने नौपाड्यातलं थोडं मार्केट मारलं आहे. साधारण १९९० मध्ये माझ्या प्रेमळ मावस सासर्यांनी मला कौतुकाने मुद्दाम सांस्कृतिक कोल्हापूर दाखवायला नेले होते. तेव्हा मला वांगी बोळातल्या कै. गोविंदराव टेंम्ब्यांच्या श्रुतीच्या पेटीबरोबर त्यांनी खासबागेतली पांढऱ्या आणि तांबड्या रश्श्याची मिसळही खिलवली होती. त्यानंतर चोरगे मिसळ खायचाही योग आला. चोरगे मिसळ आणि कावरे कोल्ड्रिंक्स यांचे काहीतरी साटे लोटे असावे.कारण मिसळ खाऊन झाल्यावर लोक कावऱ्यांकडे पडलेले असतात.  कुणाच्या लक्षात आलंय  कि नाही ते माहिती नाही, पण कोल्हापूरचे लोक मुद्दाम पुण्याला जाऊन कधीही मिसळ खात नसतात. पुलंच्या भाषेत सांगायचं तर त्यांना गुळाच्या ढेपेपासून रंकाळ्यापर्यंत कोल्हापूरच्या प्रत्येक गोष्टीचा जाज्वल्य अभिमान आहे. असो! आता पुण्याची दखल घेतल्याशिवाय मिसळीचे आख्यान पुरे होऊ शकत नाही. माझ्या आवडीचं पुण्यातलं उत्तम मिसळ मिळण्याचं ठिकाण म्हणजे 'तुळशीबागेतली 'श्रीकृष्ण मिसळ' !! त्यांच्याइतके मिसळीचे स्वच्छ दुकान मी क्वचितच पहिले असेन.  १९९०-९२ मध्ये पांढरी स्वच्छ बंडी घालून गल्ल्यावर बसलेले मालक श्रीकृष्ण जोशी हे जणू काही त्यांच्या हॉटेलच्या स्वच्छतेचे प्रतीक आहेत असे वाटे. इथे 'ब्राह्मणी मिसळ' मिळते असं मी गमतीने म्हणतो. (ह्या श्रीकृष्ण मिसळीत बटाटे पोहे असतात बरं का...!!). त्या खालोखाल मला कसब्यातली वैद्य मिसळ आवडते. वैद्यबुवांची खासियत अशी कि त्यांच्या हॉटेलच्या दर्शनी भागात एक काचेची शो-केस करून त्यात हॉटेलात येऊन विसरून गेलेल्या लोकांच्या वस्तू display केलेल्या असतात. सध्या पुण्यात काटाकिर मिसळीची क्रेझ आहे.  ठाण्याच्या मामलेदारांची परवानगी काढून  जायला पाहिजे एकदा ..... 😀

कोशिंबीर ( side-dish)

आत्तापर्यंत ह्या लेखात इतके तिखटाचे पदार्थ खाऊन झालेत. त्यामुळे पोटाला जरा थंडपणा येण्यासाठी ही साईड डिश !!...... 

काकडी ही फळभाजी वयाच्या १०व्या वर्षापर्यंत मला अजिबात आवडायची नाही. इतकी, कि सार्वजनिक गणेशोत्सवातील गणपतीच्या आरतीला 'काकडीची पचडी' प्रसाद म्हणून असली, कि मला "आज आरतीला उगीच आलो" असे वाटे. केवळ प्रसाद म्हणूनच मी ती उष्टावत असे. (गणपतीची आरती करताना कुणाची आर्तता किंवा  जीव कशात असेल काही सांगता येत नाही😆). गिरगांवात काळ्या रामाच्या देवळाच्या बाहेर एक जिन्या खालची जागा काबीज करून एक भाजीवाला भाजी विकत असे. ह्या देवळात जाऊन कुठल्याश्या देवाला प्रदक्षिणा घालताना ह्या भाजीवाल्याचे दर्शन अगदी आतून दुसऱ्या बाजूनं होई ( म्हणजे मार्केटमधील इन्साईड ट्रेडर्सना शेअर्सचे होते तसे). गांधी टोपी आणि स्वच्छ झब्बा पायजमा घातलेला, शेंदूर लावलेला आणि थोडा कर्जत -कसारा असलेला हा भाजीवाला सत्शील, सचोटीचा होता. देवळाला लागून असल्यामुळे एका अर्थी त्याच्या दुकानाला एक अध्यात्मिक टच होता. त्यामुळे त्याच्याकडून भाजी घेणे माझ्या आईला अगदी सुरक्षित वाटे ( TJSB bank मध्ये पैसे ठेवले कि अजूनही काही ठाणेकरांना वाटते तसे !!). आधी काळ्या रामाचे दर्शन घेऊन नंतर त्याच्याकडून आई  भाजी घेत असे. हा भाजीवाला. मंडईतले भाजीवाले ओरडत तशी भाज्या आणि त्याचा भाव (कधी कधी 'रत्तल' परिमाणामध्ये) ह्याची जाहिरातही करीत असे. एक दिवस त्याने काकडीची जाहिरात 'सुरती काकडी, सुरती काकडी.....' अशी केली. मी  विचारले कि 'ही सुरती काकडी काही वेगळी असते का गं आई ?? ती म्हणाली "हो, हिला किनई खूप चव असते. तू खाणार असशील तर आपण घेऊयात का आज ??". मी लगेच तयार झालो. आईने रात्रीच्या जेवणात लगेच सुरती काकडीची कोशिंबीर केली होती. तुम्हाला खोटं वाटेल पण, त्या दिवसापासून मला अचानक काकडीची कोशिंबीर आवडू लागली. आता काकडी खरंच चविष्ट होती कि मी बावळट होतो, हे सांगणं कठीण आहे. असो !! विषय निघालाच आहे तर ही 'काकड-आरती' अजून जरा पुढे नेतो.... 


मला काकडीची किंवा टोमॅटोची कोशिंबीर ही 'फोडणी' घालून नाही, तर 'दही दाण्याचे कूट  मिरची' घालूनच  जास्त आवडते.  ह्याला फक्त अपवाद आहे तो एके काळच्या गिरगावातल्या मॉडर्न हाटेलातल्या 'खमंग काकडीचा'!! तीही आता इतिहास-जमा झाली आहे. माझ्या स्वभावाने 'साधी' असलेल्या बायकोने परवा 'खमंग' काकडी इतकी सुंदर केली होती, की मला खरंच 'मॉडर्न' ची आठवण झाली. माझी आई 'कोशिंबीर' हा पदार्थ दही घालूनच अगदी छान करायची. दही घातलेली कोशिंबीर ही फोडणी घातलेल्या कोशिंबिरीपेक्षा जास्त 'सात्विक' असते असे माझे अध्यात्मिक डोके सांगते. (नाहीतरी आमच्या घरी एकंदरच फोडणीचे प्रमाण पहिल्यापासूनच कमी आहे; ह्याला आमचा खिसादेखील  अपवाद नाही😄) दही घातलेल्या कोशिंबिरीत अतिशय बारीक बारीक मिरच्या जास्त शोभा आणि चव आणतात. दाताखाली एखादा बारीक मिरचीचा तुकडा आला, तरी तो contrast चा आनंद देतो. कधी कधी अस्मानही दाखवू शकतो. दाण्याचे कूट मात्र must आहे हं. नाहीतर कोशिंबीर मींड आणि गमक नसलेल्या गाण्यासारखी 'कवकवीत' लागते. लग्नाच्या पंक्तीमध्ये वाढपी वाढत असताना १० मीटर अंतरावरून सुद्धा सर्वात आधी कशाचा स्वाद येत असेल, तर तो काकडीच्या कोशिंबिरीचा. आता थोड्याच वेळात पंचपक्वान्न आपल्यापुढे येऊ घातले आहे ह्याची हवीहवीशी चाहूल तो स्वाद देऊन जातो, असे ह्या कोशिंबिरीचे अनन्य साधारण महत्व आहे. लग्न-मुंजीच्या कार्यक्रमात कोशिंबीरीला मुंबई-पुण्यात तरी फोडणी घालत नाहीत, असा माझा समज आहे. हल्ली तर बुफे असल्यामुळे पारंपरिक पदार्थांच्या बाबतीत आनंदी आनंदच आहे.  त्यामध्ये कोशिंबीर नाही तर 'रायते' असते, ज्याला खरं म्हणजे कसलाही स्वाद नसतो. काकडीचे बारीक तुकडे करून त्यात सरोबरीने दही घातलेले असते. (अरे आमचे तांबे कॉन्ट्रॅक्टर बघा ..... कोशिंबीर बनवताना नुसते जीवाचे रान करतात.) हल्लीच्या बुफेला एक सार्वजनिक वास असतो, ज्याचे घराणे पंजाबी असते. (जसा स्टील प्लांटमधल्या कॅन्टीनमध्ये पण एक सार्वजनिक 'वास' असतो आणि तो 'स्वाद' ह्या संज्ञेपासून काही 'योजना' दूर असतो). आणि पनीर लाचारी, भराभरा कबाब वगैरे असताना कोण त्या रायत्याकडे बघणार ??? अगदी खरं सांगायचं तर हल्ली बाहेर जाऊन रेस्टॉरंटमध्ये जेवताना 'मी' सोडून बहुतेक कुणालाही हे ''रायते' ऑर्डर करायचे नसते. आणि मी देखील ते रायते 'कोशिंबीर' म्हणून नाही, तर केवळ पंजाबी मसाल्यांवरचा उतारा म्हणूनच खातो. The purpose is served well..!!

  

फळांचा राजा - 'एक अनुभव'

करोनामुळे २०२० एरवी सगळ्यांना वाईट गेले असले, तरी आंब्याचा मौसम मात्र चांगला होता. किंबहुना सगळ्यांना घरी बसावे लागल्याने जेवणातील आंब्यामुळे थोडातरी विरंगुळा वाटला. खरं म्हणजे मला हापूस आणि  पायरी आंब्याचा रस नक्कीच आवडतो. पण आयता रस खाऊन त्याने आंब्याची अनुभूती येत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. त्यासाठी आंब्याच्या फोडी खाणे अत्यावश्यक आहे. (कदाचित मी कोकण्या असल्यामुळे माझं हे मत बनलं असावं. किंवा माझ्या लहानपणापासूनच आम्ही आंबा फोडूनच खायचो, त्यामुळेही असेल कदाचित). त्या आधी तर आम्ही लहानपणी जेव्हा आजीकडे जायचो तेव्हा, पडवीत  थोडेसे वाकून उभे राहून आम्ही रायवळ आंबे चोखून खाण्याची मजा घेतलेय. हा आम्हा मावस-मामे भावंडांचा कार्यक्रम सामुदायिक असे, त्यामुळे त्याची खुमारी अजूनच वेगळी. 'फोर्क' संस्कृतीवाले तर सुंदर प्लेटमध्ये आंब्याचा गर बारीक चौकोनी तुकड्यांच्या स्वरूपात घेऊन काट्याने खातात. प्रसंगी आयुर्वेदिक टॅबलेटसारखा गिळतही असतील. आंबा खाण्याच्या अनुभवापासून दूर कसे जायचे हे त्यांच्याकडून जरूर शिकावे. गिरगावात आमचे एक शेजारी आंब्याचा व्यवसाय करीत. समरसून जगणे म्हणजे काय, हे त्यांना चांगले माहित होते. आंब्याच्या मोसमात ते आपल्या दोन वर्षाच्या छोट्या मुलीला मोरीत उघडीबंब उभी करायचे. कट्ट्यावर आंब्याची करंडी ठेवायचे. ते पोरगं साधारण येईल जाईल त्याच्या बरोबर टीवल्या-बावल्या करीत अर्धा तास आंबे खात असायचं. अर्ध्या तासाने पाहिलं तर पोरगं नखशिखान्त 'र स भ री त' झालेलं असायचं. लोणी दही खाणाऱ्या बाळकृष्णाचं  चित्र आणा डोळ्यासमोर, म्हणजे कळेल मी काय म्हणतो ते. ( अर्थात अशाच समरसतेमुळे कि काय , पण ह्या गृहस्थाला ७ वर्षात ४ अपत्ये झाली 😄). माझी एक खोड म्हणजे सहसा मी मँगो मिल्कशेक घेत नाही आणि मँगो आईसस्क्रीमही खात नाही. आंबा हा आंब्याच्या स्वरूपातच खावा असं कुठेतरी डोक्यात आहे. पण आंब्याची साटे, पन्हे , आंबे डाळ आणि चटणी (इति कर्मणे) हे पदार्थ त्याला अपवाद आहेत. 'कर्मणे' म्हणजे कच्या कैरीचा कोळ काढून गूळ आणि फोडणी घालून केलेली चटणी !! ह्याला मी गमतीने अध्यात्मिक पदार्थ म्हणतो ( संचित कर्म, क्रियमाण ह्या चालीवर.... 'कर्मणे' !! ) आमच्या ठाण्यात लग्नाचा एक केटरर Thai Roll ice cream म्हणून देतो, त्याला कच्च्या कैरीचा फ्लेवर असतो म्हणे. जे लोक चायनीज भेळ खातात , त्यांनी हे आईस स्क्रिम जरूर खावे बापडो .... 

डेझर्ट

वर जे काही सगळं लिहिलंय, त्याने आपल्या विशाल आणि समृद्ध महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीमधली एक ओंजळही भरणार नाही. आणि संस्कृतीवर्धन हा तर ह्या लेखाचा मूळ हेतू मुळीच नाही. पण हे निवडक पदार्थ म्हणा किंवा डिशेस म्हणा, ह्या माझ्या (आणि कदाचित तुमच्याही ) नक्कीच जिव्हाळ्याच्या आहेत, आणि त्यामुळेच प्रत्येकावर निदान एक परिच्छेद तरी मी लिहू शकलो. आता ह्या लेखाची समाप्ती मी एखाद दुसर्या आवडीच्या डेझर्टचा सहज उल्लेख करून करणार आहे. 

माझी सगळ्यात आवडती स्वीट डिश म्हणजे आटवलेली आणि चारोळ्या घातलेली बासुंदी !! काही स्वीट होम्स 'अंगूर बासुंदी' म्हणून देतात ती मला अजिबात मान्य नाही, कारण त्यामध्ये बासुंदी न देता चक्क फेव्हर्ड दूध असते. This is simply an eyewash !! त्यापेक्षा सीताफळ बासुंदी घ्यावी. त्या खालोखाल मला आवडणारा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी !! ठाण्यामध्ये अत्यंत उच्च प्रतीच्या पुरणपोळ्या बनवणाऱ्या काही अन्नपूर्णा आहेत. गरम ताज्या पुरणपोळीवर आधी साजूक तुपाची धार सोडलेली असावी आणि मग ती पुरणपोळी वाटीतील दुधात घालून खावी असं माझं वैयक्तिक मत आहे. पोळी खाऊन झाल्यावर पुरणपोळीचा गाळ असलेले वाटीतले उरलेले दूध तीर्थप्राशनासारखे पुण्यभावाने पण चवीने प्यावे, म्हणजे पोटपूजेची सांगता शास्त्रोक्त होते.  त्यानंतर माझे आवडते डेझर्ट म्हणजे फ्रुट सॅलॅड !!  घरी करायचे असेल, तर ह्याला बऱ्यापैकी मेहेनत आहे. पूर्वी आमच्या घरी वर्षातून किमान २ वेळा फ्रुट सॅलड होत असे. याचे कारण माझे वडील जी लागेल ती मेहेनत करायचे. फ्रुट सॅलॅडची रेसिपी समजावून घेण्याची गरज आहे. नुसत्या फळांच्या फोडी आणि त्यात दूध म्हणजे फ्रुट सॅलड नाही हे लक्षात घ्यावे. (तसे असेल तर त्याला आम्ही फ्रुट शिकरण म्हणतो 😅). त्यासाठी जमल्यास थोडेसे आटवलेले दूध वापरावे. नाहीतर त्यामध्ये कस्टर्ड पावडर घालून ते जरा 'घन' करावे. माझ्या पत्नीने यासाठी एक छान वंजन बरेच वेळा वापरले आहे .. ते म्हणजे त्यामध्ये कंदी पेढा कुस्करून घालणे. फ्रुट सलाड एकजीव होण्यासाठी ह्याचा खूप उपयोग होतो. काही लोक फ्रुट सॅलॅड चविष्ट व्हावे म्हणून त्यात कप आईसक्रीम देखील घालतात.  फ्रुट सलाडवर मला थोडेसे सायीचे दही आवडते. विशेष करून ते आंबट असेल तर, काँन्ट्रास्ट मॅचिंगचे सुख मिळते. 
विशेष सूचना : कृपा करून फ्रुट सॅलड खाण्यापूर्वी कुठल्याही आयुर्वेदिक वैद्याला भेटू नका किंवा विचारू नका. तो तुम्हाला फळे आणि दूध हे कसे विरुद्ध अन्न आहे हे शास्त्र शिकवून काव आणेल आणि हा पदार्थ खाण्यातला तुमचा उत्साह पूर्णपणे मारून टाकेल. फार तर त्याला म्हणावं " विरुद्ध अन्नाने पोटाला त्रास झाला तर चूर्ण घ्यायला तुमच्याचकडेच येणारे". असो !! आता भेटूया असेच कधीतरी ....एखादा वेगळा पदार्थ घेऊन .... बाय फॉर नाऊ !!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

“Food is maybe the only universal thing that really has the power to bring everyone together” - GUY FIERI, American restaurateur

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


विकास कात्रे, ठाणे 
मो : ९८३३६१०८७५

थोडक्यात पण महत्वाचे :

ह्या लेखात मी जे काही लिहिलंय, ते माझ्या आवडीनिवडींच्या परिघाशी निगडित आहे.  'पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना....' हे सत्य मला पूर्णपणे मान्य आहे. त्यामुळे मला जे नावडते, ते आणखी कुणाला आवडू शकते ह्यावर माझा विश्वास आहे. हा लेख केवळ मनोरंजनपर आहे, हे लक्षात घेणं जरुरीचं आहे. कुणाच्याही भावना दुखविण्याचा माझा अजिबात हेतू नाही. आणि तसं काही ह्या लेखात नकळत घडलं असेल, तर क्षमस्व !!🙏

 











Comments

  1. बाप रे बाप. कात्रे साहेब तुम्हांला ह्या बद्दल PhD नागी सरळ Dec द्यायला हवी. रोजचा taken for granted वाटणारा विषय किती रसाळ व सुंदर मांडलात. अभिनंदन.

    ReplyDelete
    Replies
    1. उत्साह वाढवणाऱ्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! आपलं नाव मात्र जरूर कळवा इथे...

      Delete
    2. मी अनुराधा मुजूमदार.

      Delete
  2. Ek number sir... maja aali vachun

    ReplyDelete
    Replies
    1. उत्साह वाढवणाऱ्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! आपलं नाव मात्र जरूर कळवा इथे..

      Delete
  3. Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! आपलं नाव मात्र जरूर कळवा इथे.

      Delete
  4. मज्जा आली.... वाचून आणि वाचता वाचता सगळे आठवून...

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! आपलं नाव मात्र जरूर कळवा इथे..

      Delete

      Delete
  5. Khup Chhan , vachtana Tondala Pani sutle.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! आपलं नाव मात्र जरूर कळवा इथे..

      Delete
  6. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  7. काका, चोचल्यांनी चांगलच बंड पुकारल😅
    तुमची खाद्यभ्रमंती खुपच आवडली । या खाद्य मुशाफीरीच्या भन्नाट अनुभवा बद्दल खुप धन्यवाद।😊👌

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! आपलं नाव मात्र जरूर कळवा इथे..

      Delete
  8. खूपच सुरेख लेख,प्रत्येक पदार्थ तपशीलासह वर्णन तुमचे निरीक्षण दर्शवितो, भाग 2 च्या प्रतीक्षेत. एक्स्पर्ट ओपिनियन साठी नवीन पदार्थ तुमच्या कडे पाठवायला हवा 😊

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार माधुरीजी,
      माझ्या लेखनाचा उत्साह वाढवणाऱ्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !! खरं म्हणजे माझ्या नसणाऱ्या प्रांतात मी जरा लुडबुड केलीय. काही पदार्थ आणि अन्नपूर्णाच माझ्याकडून भाग २ लिहून घेतील असं दिसतंय. बघुयात केव्हा ते. महाराष्ट्रात खाद्य पदार्थांना काही तोटा नाही. येथे नवीन पदार्थ आनंदाने प्राशन केले जातील.....👍

      Delete
  9. लेख रिकाम्या पोटीच वाचला पण नुसतेच reading and imagining झाले. पोट भुकेने चांगलच कासावीस झाल. लेख नेहमीप्रमाणेच वाचनीय आणि रंजकही!

    ReplyDelete
    Replies
    1. मंजिरी, छान वाटलं तुमचा अभिप्राय वाचून !! ठाण्यात या अनुभव घ्यायला....

      Delete
  10. मित्रा विकास, किती सुरेख, समर्पक आणि अभ्यासू असे लिहिले आहेस. आता हे सगळे पदार्थ खाताना पहिली तुझी आठवण येईल.

    ReplyDelete
    Replies
    1. उदय,
      मनापासून धन्यवाद !! तुझ्यासारख्या लेखकाकडून पावती मिळाली की नक्कीच समाधान वाटते. कधीतरी ठाण्यात एकत्र जाऊ ह्यातल्या एखाद्या तरी जॉईंटवर.....

      Delete
  11. नेहमी प्रमाणे प्रभावशाली लिखाण .. प्रत्येक पदर्था बद्दल ची माहिती वाचताना पदार्थ तर डोळ्या समोर आलेच पण तोंडाला ही पाणी सुटले ... ठाण्याला बटाटे वड्यासाठी पहिला मान दिल्याबद्दल आनंद (अभिमान) वाटला... मी ह्या बाबतीत कदाचित biased झाले असेन.. शेवटी मी ही born and raised in ठाणे ना 😉.

    ReplyDelete
  12. अप्रतिम चोचलेगीरी. तुमच्या सारख्या खवैय्याने एकेका पदार्थाचे एकदम नजाकतीने वर्णन केले आहे

    ReplyDelete

Post a Comment